रत्नागिरी : रत्नागिरी ते गोवा हे ३१२ किलोमीटरचे अंतर तीन दिवसांत सायकलने यशस्वीरीत्या पार करून रत्नागिरीतील १० सायकलपटूंनी प्रदूषणमुक्त कोकणाचा संदेश सर्वांना दिला. वीरश्री ट्रस्ट आणि सायकल क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने ही सायकलची ‘कोकण भरारी’ मोहीम नुकतीच पार पडली.
गोव्याला जाण्यासाठी पर्यटक मोठ्या उत्साहाने तयार असतात. परंतु सायकलने गोव्याला जाऊन ‘प्रदूषणमुक्त कोकण’ हा संदेश सर्वत्र पोहोचविण्याची कामगिरी रत्नागिरीतील १० सायकलपटूंनी केली आहे. त्यात डॉ. नीलेश शिंदे, डॉ. तोरल शिंदे, डॉ. निशिगंधा पोंक्षे, कल्पेश चव्हाण, विनायक पावसकर, डॉ. नितीन सनगरे, मंगेश शिंदे, माधव काळे, सौ. निमा काळे, किरण चुंबळकर यांचा सहभाग होता.
सागरी महामार्गावरून म्हणजेच कोकणच्या सागरकिनाऱ्यावरून तीन टप्प्यांत हा प्रवास पूर्ण झाला. पहिल्या दिवशी पावस, पूर्णगड, आडिवरे, धारतळे, नाटे, जैतापूर, कात्रादेवी मंदिर, जामसंडे असा प्रवास करून सायकलपटू देवगड येथे राहिले. हा त्यांचा प्रवास १०१.२ किलोमीटरचा होता.
दुसऱ्या दिवशी देवगडहून निघून मिठबाव, मालवण, चिपी विमानतळ, परुळे या मार्गे सायकलपटू वेंगुर्ले येथे पोहोचले. हा प्रवास १०६.५ किलोमीटरचा होता. तिसऱ्या दिवशी वेंगुर्ल्यातून निघून मोचेमाड, शिरोडा मार्गे सर्व जण गोव्यात करमळीला पोहोचले. हा प्रवास १०४.३ किलोमीटरचा होता.
जिद्दी माउंटेनीअर्सच्या टीमने त्यांना सहकार्य केले. ‘हा प्रवास करताना कोकणचे वेगळे सौंदर्य अनुभवता आले आणि हे सौंदर्य टिकवण्यासाठीच आपण प्रदूषणमुक्ती केली पाहिजे. वाहनांचा अगदी आवश्यक असेल तिथेच वापर करून सायकलचा वापर वाढवला पाहिजे,’ असा संदेश डॉ. तोरल शिंदे यांनी या वेळी दिला.
२०१८मध्ये वीरश्री ट्रस्टने रत्नागिरीत पहिल्या सायक्लोथॉनचे यशस्वी आयोजन केले होते. त्यानंतर सायकल क्लबची स्थापना करण्यात आली. या क्लबच्या सदस्यांनी वर्षभर रत्नागिरी आणि परिसरात सायकलस्वारी केली. डिसेंबर २०१९मध्ये दुसऱ्या सायक्लोथॉनलाही चांगला प्रतिसाद मिळाला. प्रदूषणमुक्ती आणि आरोग्य यासाठी सायकलींच्या वापराबद्दलची जागृती वाढू लागल्याचे दिसू लागले. त्यानंतर रत्नागिरी ते गोवा सायकलवारीचा उपक्रम आखण्यात आला. विविध वयोगटांतील १० जण त्यात सहभागी झाले होते आणि त्यांनी तो उपक्रम यशस्वीपणे पार पाडला.